पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
2.37K subscribers
121 photos
4 videos
37 files
24 links
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Download Telegram
पुढील भाषण आहे १९८९च्या ‘जागतिक मराठी परिषदेच्या’ कार्यक्रमात केलेलं. “आयुष्यातला परमोच्च आनंदाचा आणि कृतज्ञेचा क्षण” काय एकेक षटकार मारलेत पुलंनी! वानगीदाखल हेच पहाना!
“आकाशात देवी आहे का?” असं जर मला कोणी विचारलं, तर मी सांगेन की, मला माहीत नाही. मला एकच माहिती आहे - ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस-रात्र अशी वेळ नाही, असा क्षण नाही; की लताचा स्वर ह्या जगात कुठूनतरी कुठेतरी जात-येत नसतो.
फक्त चार एक पानी. आणि आठ-नऊ मिनिटांच. इथं पाहायला मिळेल: https://youtu.be/BKTwQbGPKaQ
- “आयुष्यातला परमोच्च आनंदाचा आणि कृतज्ञेचा क्षण” (१९८९) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
"तु मायन्यात "चरणस्पर्श" केल्यामुळे मी चाट झालो. वयाने लहान असल्यामुळे तुला मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही. तुझ्या लक्षावधी गीतांतल्या एकही गीतातल्या चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे! पूर्वीचे राजे मुलुख पादाक्रांत करायचे तु सारे जग "पादाक्रांत" केले आहेस. हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको, ह्याच शुभेच्छा !"

(भाई- लता दीदींना लिहिलेल्या एका पत्रातून)
*शिंपी आणि सुट*
*अपूर्वाई*
*पु.ल देशपांडे*

आजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्य़ा ओढी !

शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खूशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.

*(अपूर्वाई)*
मराठी रंगभूमीची तर परंपराच आहे. आमचे जे सगळे श्रेष्ठ नट आहेत, त्यांचा उल्लेख आम्ही एकेरी नावानेच करत आलेलो आहोत. छोटा गंधर्वांना 'ते' छोटा गंधर्व असं कोणी म्हणत नाही. 'अरे, तो 'आपला' छोटा गंधर्व गायला' असाच उल्लेख होतो. त्याच्यामागे हा जो 'आपला' असतो, तो ह्या एकेरीवरती चांगल्या तऱ्हेने यायला प्रवृत्त करता असतो. तसंच गोविंदाचं आहे. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे
*पुलं गौरवगीताचे बोल*


जय जय पुरुषोत्तमा...


वंदन करिती तुला रसिकजन जय जय पुरुषोत्तमा

कलागुणांचा तू अधिकारी गुणाढ्य सर्वोत्तमा


रसिकांवर किती गारूड केले शब्दा शब्दांमधुनि

विनोद नाटक गंभीर आशय, नीटस समीक्षेतुनि

पूर्वरंगचे प्रवासवर्णन आणि रंगपश्चिमा

जय-जय पुरुषोत्तमा


संगीत भोक्ता उत्तम वक्ता नाटक कर्ता गुणी

विनोदबुद्धी व्यक्ती वल्ली गुण गाईन आवडी

किती अलौकिक अद्भुत सद्गुण एकेठाई जमा

जय-जय पुरुषोत्तमा


तू पुरुषोत्तम... तू पुरुषोत्तम कुबेर साहित्याचा

सुंदर मी होणार दिला हा मंत्र एक जिद्दीचा


अष्टपैलूहून अधिक कलागुण त्याला नाही सीमा

जय जय पुरुषोत्तमा...


गीत : मधुसूदन नानिवडेकर
मला अध्यक्ष म्हणून बोलावल्याचा बहुमान वाटला, असं वाटायचे दिवस गेलेले आहेत. मी होऊ नये इतका अध्यक्ष होत चाललो आहे. त्यामुळे 'हल्ली 'काय करता?' असं जर मला कोणी विचारलं, तर 'अध्यक्षपदाची भाषणं करतो' एवढंच मी सांगतो. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
*पु.ल.देशपांडे : या सम हा!*
प्रा. मिलिंद जोशी

पुलंचं नुसतं नाव जरी उच्चारलं, तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होतं. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला; म्हणून तर आपण पुलंना आनंदयात्री म्हणतो. श्री. म. माटेमास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो. ’महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही, की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.
नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राजकर्त्यांवर तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे!’’ पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्र्यांच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात.’’ लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.’’ आचार्य अत्र्यांचा शब्द खरा ठरला. अत्र्यांच्यानंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.
जीवनातील विसंगती आणि विकृतींकडे दयाबुद्धीने पाहणार्या पुलंच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदाने कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारले नाही आणि रक्तही काढले नाही. पुलंच्या विनोदाने मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं, तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती.
बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंजातल्या पाण्याच्या धारेप्रमाणे सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता. पुलं दहा-अकरा वर्षाचे होते, तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया अॅेक्ट’ या विषयावर व्याख्यान होते व्याख्यानानंतर शंकानिरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहात केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिरांचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरले नाही. पुलंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचे मन वकिलीत रमले नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझे मन वकिलीत रमले नाही असे म्हणण्यापेक्षा आशिलाचे मन माझ्यात रमले नाही’’ असे म्हटले, तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात, त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो, मी वकिली केली असती तर...’’
पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंसं काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी असे इतके पदार्थ आणले होते, की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत; ‘ढेकर’ नाही.’’विजापूरला शाळेत पुलंचे भाषण होते. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं. म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय, आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला. महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नसतो.
(व्हॉटस् अॉप वरुन)

असे वसंतराव देशपांडे*
लेखक:-पु. ल. देशपांडे

पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्यही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले -

“अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजवाहीर असे दण-दण दण-दण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील!”_

वसंताच्या स्वभावातच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा _'मिजाज'_ आहे.

निखारे असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! म्हणूनच की काय कोण जाने _‘शतजन्म शोधितांना’, ‘असे जीत पहा’_ यासारख्या किंवा _‘रवी मी भाळी चंद्र असे धारिया’_ ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रीक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे.

पण कलावंताला म्युनिसिपालिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!

वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. _‘कट्यार काळजात घुसली’_ मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारातली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे!

पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हणासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही.

नागर आणि ग्रामीण हिंदीचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतरावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट!

कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला, अध्यात्म, अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती- त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही.

आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्या तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे _'कारकुनी'_ ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा.

पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही.

मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिले आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी!

पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमाला पाठ असाव्यात त्याला! _'जिनमध्ये लाइम कॉर्डियलचे प्रमाण काय',_ इथपासून ते _'अवकहडा चक्र'_ म्हणजे काय इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य!

वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चंपूताईच्या घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे.

कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदार मामला आहे.

भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी. पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी.
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1
Forwarded from Marathisahitya.in
गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश / कॅप्शन आणि स्टेटस्
शेअर करायला विसरू नका.
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-captions-in-marathi.html?m=1
परवाचीची गोष्ट... _'कट्यार'_ मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे. भीमसेनचे मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. _“वश्याबुवा, हा तुझा तबलजी!”_

जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणून रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो! ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात.

एवढ्याने काय झाले आहे... हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन _“ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या - हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोंबला.”_ अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना.

तीन वर्षापूर्वी प्रथम ऐकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या _‘सुलतान षरके यार’_ या गाण्यापासून अगदी परवा ऐकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे.

आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे _“माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला.”_ त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या स्नेहाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी घातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे.

वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऐकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते.

वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपणाने मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातुन बेफाम दौडत जाणार्‍या जवान घोडेस्वारासरखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.

वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. सूरांचा हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्‍यांना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्‍या बर्‍या !

वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.

– पु. ल. देशपांडे .------------------ -

पु. ल. देशपांडे यांचे वसंतरावांच्या विषयीचे प्रेम, कौतुक, त्यांच्या गायकीला दिलेल्या सुरेख उपमानी तेजाळले आहे.

वाचनीय व संग्रही ठेवावा असा सर्वांग सुंदर लेख आहे।
*पु.ल.यांचे बंधु श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची मुलाखत*

*(स्मिता मनोहर आणि मनोज प्रभू यांनी श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची घेतलेली मुलाखत* *– दि. ४ जून २००२)*

५, अजमल रोड, त्र्यंबक सदन’…. पार्ल्यात पोहोचलो आणि ‘त्र्यंबक सदना’च्या दिशेनी आम्ही भारावल्यासारखे चालू लागलो. गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न…..पु.लं.च्या घरी जायचं… जे कदाचित स्वप्नच राहिल असं वाटत होतं, ते आज पूर्ण होत असल्याचा आनंद, बरीचशी उत्सुकता, पण एक हुरहुर अशा संमिश्र भावना मनात दाटून येत होत्या. पु.लं.चं बालपण, त्यानंतरचं समृध्द जीवन याच्या अनेक वर्षांच्या आठवणी जिथे दडल्या आहेत, तिथे आम्ही आज जात होतो, पण पु.ल. नसतांना. पु.ल. आज पार्ल्याचाच काय पण या जगाचाच निरोप घेऊन गेल्यानंतर आज त्र्यंबक सदन कसं असेल?…. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा योग यावा, पण प्रत्यक्ष परमेश्वरानी त्याआधीच तिथून आपला मुक्काम कायमचा हलवावा, अशा वेळी भक्ताची जी अवस्था होईल ती अनुभवत मी आणि मनोज गेट जवळ पोहोचलो.
मनोज मूळचा पार्लेकरच. त्यामुळे पूर्वीचं त्र्यंबक सदन, त्यासमोरचा रस्ता, रोज संध्याकाळी तिथल्या बाकावर पु.लं.चे भाऊ उमाकांतकाका बसत ती जागा आणि ते हुबेहुब पु.लं.सारखे दिसत असल्याने फसलेला मनोज आणि त्याचा मित्र. अशा गमती जमती त्याच्याकडून ऐकतच आम्ही जिना चढून वर गेलो.
रमाकांतकाका आमचीच वाट बघत होते. हे पु.लं.चे सर्वात धाकटे भाऊ. पु.लं.पेक्षा १० वर्षांनी लहान. तर उमाकांतकाका ३ वर्षांनी लहान. ते आम्हाला उमाकांतकाकांच्या खोलीत घेऊन गेले. ८० वर्षांचे उमाकांतकाका आता पूर्णपणे अंथरुणावरच असतात. ‘भावाची साहित्यिक नाही तरी ही गादी मात्र चालवत आहे,’ असं ते म्हणाले आणि आम्ही हेलावून गेलो. गेल्या ८० वर्षांच्या काळात पु.लं.ची लहानपणापासूनची जडणघडण, अनेक चांगले वाईट अनुभव, लाभलेले मानसन्मान, पु.लं.ना रसिकांचे मिळालेले उदंड प्रेम आणि हेवा करायला लावणारे पु.लं.चे समृध्द आयुष्य या दोघांनीही अगदी जवळून पाहिले असल्याने, असंख्य आठवणींचा खजिनाच त्यांच्याकडे आहे. आज या खजिन्यातील काही आठवणी प्रत्यक्ष या दोघांकडून ऐकायला मिळणार होत्या. स्वत:च्याच भाग्याचा हेवा करत त्यांचा शब्द न शब्द मी कानात साठवू लागले.

बोलता बोलता उमाकांतकाका ६०-७० वर्ष मागे गेले. आम्ही सुरुवातीला जोगेश्वरीला ज्या सोसायटीत रहायचो तिचं नाव ‘सरस्वती बाग’. सुरुवातीला आम्हाला तिथे रहायला जागा मिळेना. सोसायटीतच एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही रहायचो. मग वर्ष- दोन वर्षानी आम्हाला रहायला जागा मिळाली. त्याकाळी जोगेश्वरीत टाकी महाराज म्हणून होते. ‘पुरुषोत्तम’ हे नाव त्यांनी ठेवलं. हल्लीच्या महाराजांसारखे ते बुवाबाजी वगैरे करणारे नव्हते. ते education inspector होते. Retire झाले होते आणि प्रवचन करायचे. भाईचं, माझं, रमाकांतचं नाव त्यांनीच ठेवलं. २८-३० साली आम्ही जोगेश्वरीहून पार्ल्याला आलो ते आत्तापर्यंत इथेच आहोत. भाई, मी आणि रमाकांत आमच्यापासून ते आमची तिसरी पिढी सुध्दा ‘पार्ले टिळक’ मध्येच शिकली. आम्ही शाळेत असतांना, जात-पात वगैरे गोष्टींबाबत लोक जागरुक असत. ‘मासे कोण खातात त्यांनी हात वर करा’ असंही चक्क शाळेत विचारत. मग आम्हीही आपले इमाने इतबारे हात वर करत असू. कोकणस्थ नाही तो अस्पृश्य असंच समजलं जायचं. अर्थात आम्हालाही कधी या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. राग यायचा कधीकधी पण ते त्यावेळचे संस्कारच होते तसे. पण जे दोस्त होते ते मात्र सगळे ब्राह्मण. एकदा माझ्या समोरच घडलेला हा किस्सा- आमची आई शेव छान करायची. संध्याकाळी शाळा सुटली कि शेव खायला सगळे जण आमच्या घरी. एकदा भागवत आडनावाच्या एका मित्राने भाईला विचारलं,”पुरुषोत्तम, तू देशपांडे म्हणजे सारस्वत ना?” भाई म्हणाला, “हो”
“मग तुम्हाला काय म्हणायचे माहितीये?”
“काय?”
“तुम्हाला शेणवी म्हणत असत. कारण तुमचे पूर्वज शेण विकायचे.”
भाईनी ताबडतोब उत्तर दिलं. “तुमचे पूर्वज शेण खायचे म्हणून आमचे पूर्वज शेण विकायचे.”
शाळकरी वयापासून अशा प्रसंगांना हसत हसत पु.ल. टोला मारत. जाती व्यवस्थेविषयी पु.लं.च्या मनात चीड म्हणूनच निर्माण झाली असावी. पुढे वयाने, कार्याने मोठे झाल्यावर पु.ल. हा राग बाहेर काढू शकत होते.पण उलट त्यांनी माणूस ही एकच जात कायम मानली आणि ते स्वत:ही कायम तसेच वागले.
लहानपणापासूनच हजरजबाबी असलेल्या पु.लं.चा आणखी एक किस्सा सांगताना रमाकांतकाका म्हणाले, नागपूरच्या एका सभेमध्ये सुरुवातीला अत्रे बोलले. नेहमीप्रमाणे हशा, टाळ्या सगळी सभा अत्र्यांनी जिंकली. मग भाई उभा राहिला. आता हा काय बोलणार असा सगळ्यांना प्रश्न पडला. पण सुरुवातीलाच अत्र्यांची ओळख करुन देताना भाई म्हणाला,’नरसिंहासारखी बलदंड शरीरयष्टी असलेल्या या माणसाचे नाव प्रल्हाद!’ आणि या एका वाक्याने भाईने सभा फिरवली. तसंच एकदा वहिनीनी काहितरी काम सांगितलं. दोन-तीनदा सांगूनही ते काम झालं नाही.
*पु.ल.देशपांडे ५० विनोदी किस्से*

१) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले, 'बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो"

२) माहेरचा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' .

३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा मित्र शरद तळवलकर" "हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"

४) पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद
" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणार्‍याचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ."

५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखवणारा आहे. ते पंधरा वर्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.

त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती. शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही." तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, "पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.

६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार". ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. "तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"

७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"

१०) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे.
त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रिकेखाली स्वाक्षरीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"

१२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसार केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा,कयाssssळs!'

१३) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'

१४) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.

१५) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.

१६) वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.

१७) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!

१८) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"

१९) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

२०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहीत असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली,"अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?" त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"

२१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"? पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता !

२२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

२३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

२४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही." पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"
२५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र. "आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."

२६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

२७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस."

२८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

२९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?

३०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.

३१) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"

३२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"

३३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

३४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग.. महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

३५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'

३६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'

३७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता. 'एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"

३८) काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले, 'आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत
३९) आणीबाणी नंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, ' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

४०) एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं. प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ' पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.

४१) एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.

४२) एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं. ' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.

४३) गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '

४४) हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं.'मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअर होस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?' त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात

४५) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, " चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज. चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ' चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'

४६) पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'

४७) १९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.