पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
2.17K subscribers
121 photos
4 videos
37 files
24 links
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Download Telegram
४८) ' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा.त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !

४९) "हॅलो , शांताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
"' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?'' फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शांताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ... बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्य क्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शांताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .

50) एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? " त्यावर पु ल लगेच म्हणाले, "हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून विकायचो आम्ही.!"..
Forwarded from Marathisahitya.in
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हारलात तर अहंकार हारेल.
@suvichar_marathi
आज मला पेटीवाला म्हणून बोलावलं, म्हणून खरंतर आज मी इथं आलोय. तुम्हांला काय सांगू, मी पेटी वाजवतो, हे लोकांना ठाऊकच नव्हतं. एका गृहस्थांना मी माझी पेटीवादनाची कॅसेट दाखवली आणि ती ऐकल्यानंतर ते म्हणाले, "म्हणजे आपण पेटी वाजवता वाटतं?” म्हणजे, एखाद्या बाईने आपलं मूल दाखवून म्हणावं की, 'माझा बाबा बघा किंवा माझी बेबी बघा' आणि समोरच्याने 'म्हणजे आपलं लग्न झालंय वाटतं?' असं विचारावं, तसं हे झालंय; :-) - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) # पुल # पाचामुखी
*पुलंचं देणं*

*चंद्रकांत बाबुराव राऊत*

( कृपया, कोणताही लेख share किंवा forward करताना मूळ लेखक, व्यक्ति यांच्या नावानेच forward करा.
संकलन मध्ये स्वतःचे नाव टाकून मूळ लेखकाचे नाव डिलीट करू नका.)


' पुलं'चं लिखाण, त्यांचे परफॉर्मन्सेस आजही अनेकांना आनंद देतात, क्षणभर का होईना त्यांच्या निखळ विनोदातून जगण्यातल्या दैनंदिन विवंचनांचा विसर पडतो... 'पुलं'च्या या मोठेपणाची जाणीव मराठीतून एमए करूनही केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या या लेखकाला आहे. म्हणूनच कामाच्या निमित्ताने त्यांचा 'पुलं' आणि सुनिताबाईंशी जो काही संबंध आला, ती त्यांना त्यांच्या आयुष्यातील फार मोलाची कमाई वाटते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात, निमित्त पुलंच्या नुकत्यात पार पडलेल्या जयंतीचं...

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ; विद्याथीर् सहाय्यक समितीचा एक विद्याथीर् दुकानाचे दार उघडून आत आला. 'तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे.' -त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून 'सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत'- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गिऱ्हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 'हो लगेच निघतो' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिऱ्हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. 'पुलं'चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिऱ्हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. 'राहू द्या होे; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही.' त्याच्या या वाक्यातून 'पुलं'बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मागीर् लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महषिर् देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी 'रुपाली'मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि 'या' म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले. 'थोडावेळ बसा; भाई जरा नाश्ता करतो आहे' असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुचीर् देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. 'चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका' म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या. त्यांचे लक्ष नाही असे पाहून 'फार लहान करू नका, थोडेच कापा' पुलं माझ्या कानात कुजबुजले. माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या. पहिल्याच दिवशी पुलं त्यांना 'पुलं-स्वामिनी' का म्हणतात याचा अर्थ उमगला. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतींच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.
केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व 'वा छान!' म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गंुडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.
'चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं, 'नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की 'हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील.' त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या 'तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय?' मी मनात म्हणालो 'मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो, 'एक आनंदाचं देणं'. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे... '

*चंदकांत बाबुराव राऊत*
*शनीवार, नोव्हेंबर ११ २००६*
*महाराष्ट्र टाईम्स*
परवाच या अवलियाचा स्मृतिदिन आपण साजरा केला. त्यांच्याच आठवणी, त्यांच्याच शब्दात जागवत...
मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की, भीतीने पोटात गोळा येतो; पण बोटात गोळा येतो, हे मला आज कळलं. गोविंदाबरोबर पेटी वाजवायची म्हणजे, बिरजूमहाराजांबरोबर उगीचच चार पावलं नाचण्यासारखं आहे. तसे खूप नाचलो असलो, म्हणून काय बिरजूमहाराजांबरोबर नाचायचं? - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
आमचे वसंतराव देशपांडे पेटीवाल्यांचे दोन भाग करत असत. वसंतरावांच्या खास शैलीत सांगायचं म्हणजे, "अरे, अमकाअमका ना? तो पेटाड्या आहे!" म्हणजे वाटाड्यासारखा! हा रस्ता असा जातो, तो रस्ता तसा जातो, एवढंच सांगणारा. आणि दुसरे पेटी वाजवणारे असतात. पेटाड्या असतो, तो नुसता पट्टीला पट्टी दाबत बसलेला असतो. त्यामुळे 'आपण पट्टीचे वाजवणारे आहोत' असाही त्याचा गैरसमज झालेला असतो; - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
आपल्या लाडक्या पु लं च्या वाढदिवसानिमित्त BBC News Marathi चे श्री रोहन टिल्लू यांनी लिहिलेला अत्यंत सुंदर लेख share करत आहोत.

प्रिय पुलं,
खरं तर मायना लिहितानाच हात थबकले होते. त्याचं कारण म्हणजे तुमचं या जगात नसणं. तुम्ही प्रचंड वास्तववादी आणि नश्वरवादी होतात. त्यामुळे मेलेल्यांना पत्र वगैरे लिहीणं, ही भानगड काही तुम्हाला आवडली नसती. तरीही तुम्ही आता या जगात नाही, यावर विश्वास ठेवणं काहीसं कठीणच आहे. कारण तुम्ही लिहिलेलं एखादं पुस्तक, एखादा लेख, तुमची रेकॉर्डेड भाषणं, अभिवाचन, बोरकरांच्या कवितांचं वाचन वगैरे ऐकलं, वाचलं की हमखास दाद जाते आणि तुमच्यापर्यंत ती दाद पोहोचवावी असं वाटतं. म्हणूनच हा पत्राचा खटाटोप. तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, हे माहीत असूनही.
खरं तर तुम्हाला भाई किंवा पीएल म्हणावं, असं एकदा वाटलं होतं. पण नसती सलगी दाखवणं मलाही रूचणार नाही आणि तुम्हाला तर त्याहून नाही. तसंही ओळख असूनही शारीरिक जवळीकीतून मैत्रीचं प्रदर्शन करणारा नाथा कामत तुम्हाला खटकत होताच. नाथाची होती, तेवढीही तुमची आमची ओळख नाही. हे अर्धसत्य! मी तुम्हाला ओळखतो, पण तुम्ही मला ओळखण्याची सूतराम शक्यता नाही. (हेदेखील पूर्ण सत्य नाहीच. कारण तुम्ही ज्यांच्याबद्दल लिहीलंत, मीदेखील त्याच सामान्य माणसांच्या पंथातला.)
आज ८ नोव्हेंबर. तुमचा वाढदिवस! जयंती-बियंतीच्या फासात तुम्हाला अडकवणं तुम्हालाच पसंत पडलं नसतं. उगाचच दत्ताच्या तसबिरीला घालायचा हार तुमच्या गळ्यात अडकवण्यासारखं वाटतं ते. तुम्ही असता, तर आज ९९ वर्षांचे झाले असता आणि कदाचित तुमच्याच आवडत्या पी. जी. वुडहाऊससारखे लिहिते असता. आणि आम्ही तुमचं लेखन वाचून हसत हसत अंतर्मुख झालो असतो.
वास्तविक त्यात तसा काही फरक पडलेला नाही. कारण तुम्ही एवढं लिहून ठेवलंय की, दर वेळी वाचताना काहीतरी नवीन गवसतं आणि मग मीच माझ्याशी खुदकन हसतो. हे आपल्याला आधी कसं दिसलं नाही, असा विचार सुरू होतो.
वयाची तिशी ओलांडल्यामुळे आमची पिढी वगैरे म्हणायचं धाडस करवतं. पण आमची पिढी भाग्यवान. आम्हाला पुलं बघायला मिळाले. मी कळत्या वयात आलो, तेव्हाच्या काही अमूल्य आठवणी आहेत. तुमची ओळख झाली ती माझ्या वडिलांमुळे. (तशी ती प्रत्येक घरात वडिलांमुळेच झालेली असते.) माझे बाबा तुमच्याच 'असा मी असामी'चे प्रयोग करायचे. म्हणजे अजूनही करतात. त्याची पाठांतरं चालायची. मी लहान असताना गल्लीतल्या गणपतीसाठी बाबांनी तुमचंच 'पुरुषांचं हळदीकुंकू' बसवलं होतं. त्याशिवाय 'व्यक्ती आणि वल्ली' तर बाबांच्या तोंडूनच अनेकदा ऐकलं होतं.
साधारण शनिवार किंवा रविवार दुपारची वेळ. जेवणं वगैरे झाली की, आमच्या जुन्या घराच्या मधल्या खोलीत आई, बाबा आणि मी वामकुक्षी घ्यायला पडायचो. मधल्या खोलीतला तो हवाहवासा सुखावणारा अंधार, खिडकीतून गादीवर पडणारा कवडसा, डोक्यावरून फिरणारा आईचा हात आणि प्रत्येक व्यक्ती आणि वल्ली जिवंत करणारा बाबांचा आवाज... आजही तुमचं लेखन वाचावं ते बाबांच्या किंवा तुमच्याच आवाजात, असंच वाटत आलंय.
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात. 'यमीपेक्षा सहापट गोरी', 'परांजप्या, आहेस जागा की झाला तुझा अजगर', 'यू सी, यू सी वुई हॅव बीन हेल्ड अप हियर फॉर हाफ्पा सिक्स अवर्स, यू सी' वगैरे ऐकताना हसलो होतो, नंदा प्रधान ऐकताना न कळत्या वयातही रडलो होतो, मग थोडा मोठा झालो आणि बाबांच्या तोंडून ऐकलेली सगळी पुस्तकं वाचायचा चंग बांधला. तिथे आपली गट्टी जमली.
माझ्या बरोबरीच्या लोकांमध्येही मी तसा भोटम् पंथातला. ओल्ड स्कूल म्हटलं तरी चालेल. तुम्ही विचारांनी प्रचंड पुढे असलात, तरी तुमचं एक मन कुठेतरी सुधागडजवळ अडकलेलं. आईच्या किंवा आज्जीच्या हातच्या पदार्थांच्या चवीसाठी आसूसलेलं, काळाच्या ओघात होणारे बदल पचवतानाही जुन्याच्या आठवणीने आवंढा गिळणारं... त्यामुळे तुमचं आमचं चांगलंच जमलं. जात्यावर दळण दळणारी आज्जी सुदैवाने (की दुर्दैवाने) मला लाभली, आलवणातली पणजीही बघितली, उखळ, मुसळ, पाण्याचा बंब, सगळ्या गोष्टी लहानपणी अनुभवल्या होत्या. व्यक्ति आणि वल्लीतीलच नाही, तर इतरही पुस्तकांमधली कॅरेक्टर्स आणि आपल्या आसपास वावरणारी माणसं, यात काहीतरी साम्य आहे खास, हेसुद्धा जाणवत होतंच. आधी तुम्ही हसवण्यापुरते उलगडत गेलात.
हळूहळू वय वाढलं आणि थोडीशी समज आली. (हादेखील माझा समज. अनेकांच्या मते ती आलीच नाही. पण समज ही भरतकाम किंवा विणकामाच्या नमुन्यांसारखी दाखवायची नसून बाळगायची असते, असा एक माझा समज आहे.) पुन्हा तुमची पुस्तकं वाचायला घेतली आणि पु. ल. देशपांडे हा विनोदी लेखक आहे, असा तुमच्याबद्दल चालवलेला प्रचार किती फोल आहे, हे जाणवत गेलं.
फक्त मीच नाही, घरातले सगळेच पुलं मय झाले होते. मला आठवतं पुलकित होणे, या वाक्प्रचाराचा अर्थ परीक्षेत विचारला होता आणि मी 'पुलंचं पुस्तक वाचणे' असं लिहीलं होतं. कारण ते वाचताना पुलकित होतच होतो की आम्ही! घरात बाबा, दादा, काका वगैरे गप्पा मारायला बसलो की, तुमच्या लेखनाचा विषय निघाला नाही, असं झालंच नाही.
खिल्ली लिहीताना तुमच्याकडलं विनोदाचं अस्त्र किती काळजीपूर्वक परजलं होतंत तुम्ही. एक शून्य मी वाचूनही ज्यांना तुमच्यातला विचारी माणूस दिसला नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. घरमालकास मानपत्र लिहिलंत, पण आमच्यासारख्या तुमच्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्यांनाही ते मानपत्र मायबाप भारत सरकारलाच लिहिलंय असंच वाटतं. आणि अजूनही वाटतं. हे तुमच्या लिखाणाचं यश म्हणावं की, व्यवस्थेचा पराभव?
तुमचं लेखन... मी त्याबद्दल काय लिहावं. तुमचं एक एक वाक्य असं डौलदार असतं की, काय बोलावं. तुमच्या वाक्यातला एखादा शब्द इकडचा तिकडे केला किंवा तुम्ही लिहिलेल्या शब्दाच्या जागी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला, तरी त्या वाक्याचा डौल बिघडलाच म्हणून समजा. तुम्ही लिहिलेली 'तुझे आहे तुजपाशी', 'ती फुलराणी', 'सुंदर मी होणार' ही नाटकं गद्य असली, तरी त्यातली गेयता काही वेगळीच आहे. ही नाटकं नुसती ऐकतानाही त्यांचा ताल खिळवून ठेवतो.
तुम्हाला माहीत नाही, पण सध्या इथे 'आम्ही बुवा वाचतो' असं सांगणाऱ्यांची एक टोळी तयार झाली आहे. भरीव दिसणारी, तरी प्रचंड हलकी (वजनाने म्हणतोय मी) पुस्तकं घेऊन ती वाचून 'अमक्याच्या लव्हस्टोरीत काय लफडं झालं होतं, तमक्याने गर्लफ्रेंडला कसं पटवलं' यावर चर्चाही झडतात. ते साहित्य असेल कदाचित. पण तुमच्यासारख्यांच्या साहित्यावर पोसलेल्या आमच्या पिंडाला ते कसं काय मानवावं?
'असा मी असामी'मध्ये तुम्ही मध्यमवर्ग कसा कसा बदलत गेला, हे किती समर्पकपणे मांडलं होतंत. बरं ते मांडतोय, असा कोणताही आव आणू न देता. खरं तर माझ्या पिढीने झंझावातासारखे बदल पाहिले. अजूनही पाहतोय. आम्ही चूल पाहिली, गॅस पाहिले, स्टो वर होणारा स्वयंपाक बघितला, सोलार शेगडी बघितली, पाइपलाइन गॅस बघितला आणि आता तर वीजेवर चालणारी शेगडीही बघतोय. घरात फोन नसणं इथपासून ते फोन आल्यानंतर त्याची साग्रसंगीत पूजा करून पहिला फोन लावणं, प्रेमात पडण्याच्या वयात ब्लँक कॉल्स देणं, हक्काचा पीसीओवाला गाठून एक-एक रुपयाची नाणी सरकवत समोरचा 'त्या वेळी' गोड वाटणारा आवाज कानात साठवणं, आपल्या हितगुजांची स्मारकं असलेले ते पीसीओ बुथ बंद होताना बघणं, त्याची जागा मोबाइलने घेणं, त्यातही कॉल लावायला १६ रुपयांपासून ते आता १ पैसा प्रतिमिनिटापर्यंत किती तो बदल...
आम्ही मोठे होत असतानाच नेमकं ते जागतिकीकरण-उदारीकरण आणि खासगीकरण झालं आणि झपाट्याने आसपासचं जग आणि आम्हीही बदललो. आतापर्यंत कधीच न ऐकलेले ब्रँड्स हलक्या पावलांनी भारतात शिरले होते. उच्च मध्यमवर्ग नावाची एक जमात निर्माण होत होती. आधी लोअर मिडलक्लासमध्ये असलेली आमच्यासारखी कुटुंब मिडलक्लासची पायरी चढत होती. नाक्यावरचा वाणी टापटीप झाला होता. इराणी तर केव्हाच बंद पडले होते, पण आता ठिकठिकाणच्या उडप्यांनीही मान टाकायला सुरुवात केली आणि मॅक्डोनाल्ड्ससारखी चेन उभी राहत होती. खरेदी करणं हा सुखद अनुभव बनत चालला होता. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बंद पडून त्या जागी सर्व्हिस इंडस्ट्री फोफावत चालली होती. पूर्वी अगदी मोजक्या घरांपुढे दिसणारी चारचाकी इतकी स्वस्त झाली की, घरटी दोन, तीन गाड्या येऊ लागल्या.
तुम्ही असतात, तर हा बदल कसा टिपला असतात? असा मी असामीची पुढली आवृत्ती आली असती का? बटाट्याची चाळ संपवताना तुम्ही 'एक चिंतन' लिहीलं होतंत. इथे तर एक समाजव्यवस्था मोडकळीला येत होती आणि दुसरी तयार होत होती. आमची वयं कमी होती, पण आमच्या पालकांची अवस्था नक्कीच सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच. मंगेशराव, जनोबा रेगे यांच्यासारखीच झाली असणार. पण भाई, त्यांची दु:खं नेमकी पकडणारा, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या विवंचना मांडणारा तुमच्यासारखा कोणीच आसपास नव्हता. तो असता, तर परिस्थिती बदलली असती, असं बिलकुलच नाही. पण रोजचा गाडा मुकाटपणे ओढणाऱ्या आपलीही दखल कोणीतरी घेतंय, हे बघून जरासं बरं वाटलं असतं.
माझ्या पिढीतल्याच नाही, तर माझ्या नंतरच्या पिढीतल्या अनेकांसाठीही तुम्ही आउटडेटेड झाला नाहीत. तुम्ही तेवढेच रेलेव्हंट राहिलात. तुमच्या लेखनाचा प्रभाव आमच्यापैकी अनेकांवर आहे. आमच्या लिखाणातून कधीकधी अचानक तुम्ही डोकावता. मग आमचं आम्हालाच कौतूक वगैरे वाटतं. आणि लगेचच दुसऱ्याच क्षणी स्वत:च्या खुजेपणाची जाणीवही होते. आम्ही लिहीलेलं वाईट असतं, असं नाही. पण ते तुमच्या आसपासही पोहोचत नाही.
आता झालंय असं की, जगण्यातली विसंगती आम्हाला दिसतच नाही. दिसली, तरी आम्ही ती टिपत नाही. टिपली, तरी ती मांडण्याची खाज आम्हाला सुटत नाही. सुटली, तरी मग त्यातून कोणाच्या तरी भावना दुखावतात. मग कधीकधी आम्ही अॅट्रॉसिटी केली असते, तर कधी देशद्रोह. पुलं, तुम्ही लिहीत होतात तेव्हा तुम्हालाही निषेधाची प्रेमपत्रं येत होती. पण आता प्रेमपत्रांवर भागत नाही. आता घरांवर मोर्चे येतात, लिहिणाऱ्याला सगळेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून परस्पर खटला चालवतात. त्याला दोषी ठरवून यथेच्छ समाचार घेतात. नकोसं होऊन जातं. आपण 'वझ्याचे बैल' बनून जगावं, तेच बरं, असं होतं.
पण मग पुन्हा तुम्हीच आठवता. तुम्हाला ज्या ज्या वेळी जी भूमिका योग्य वाटली, ती तुम्ही ठामपणे मांडलीत. त्याचे परिणाम काय होतील, याचा जराही विचार केला नाहीत. प्रसंगी परिणाम भोगायलाही तयार होतात आणि तसे भोगलेतही. तुमच्या भूमिकांवर टीकाही झाली. तुम्ही नेहमीच बोटचेपी भूमिका घेतलीत, असंही काहींचं म्हणणं आहे. पण उगाच पेटून वगैरे उठणं आणि कोणाच्या तरी कानशीलात भडकावणं, हा तुमचा स्वभावच नव्हता. त्या अर्थी तुम्ही मध्यमवर्गीयच राहिलात. आमच्यासारखे. पण तरीही भूमिका मांडणं तुम्ही सोडलं नाहीत. कधीकधी आयुष्यात खूप नैराश्य येतं. सगळं जग आपलं दुष्मन झालंय, असं वाटतं. मग मी शांतपणे तुमचं एखादं पुस्तक काढतो. पाचव्या मिनिटाला भोवतालाचा विसर पडतो. मी दंग होऊन जातो. पुस्तक खाली ठेवून उठतो, तेव्हा मी बदललेला असतो. जगण्याची, झुंजण्याची नवी ऊर्मी घेऊन तयार असतो.
आज तुमचा वाढदिवस... आम्ही मराठी माणसं खरंच थोर की, आमच्या मातीत तुमच्यासारखा माणूस घडला ज्याने आम्हाला एवढं भरभरून दिलं. हजार हातांनी दिलंत. आमच्या झोळ्या फाटक्या... जेवढं घेऊ शकलो, तेवढं घेतलं. पण घेता घेता देणाऱ्याचे हात मात्र घेता आले नाहीत, हेच शल्य आहे.
- तुमचा,
रोहन टिल्लू.
Rohan Tillu

पूर्वप्रकाशित दि. ०९/११/२०१७
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
वाद्य जर बोललं, तर ते वाद्य आपलं वाद्यपण सिद्ध करतं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) # पुल # पाचामुखी
किंबहुना भारतीय संगीताची सुरुवातच वाद्यापासून झालेली आहे. 'आद्य महादेव बीन बजाये' असं म्हटलेलं आहे. वीणेपासून आमच्या संगीताची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या जुन्या शास्त्रकारांनी आपल्या देहाला 'शरीरवीणा' असं म्हटलेलं आहे. गवई ज्या वेळेला गातो, त्या वेळेला शरीरवीणा वाजली, तरच ते गाणं गाण्यासारखं वाटतं. आपण ‘गाणं चांगलं झालं' असं म्हणताना म्हणतो ना की, वीणा चालू आहे असं वाटत होतं, सतार चालू आहे असं वाटत होतं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) # पुल # पाचामुखी
*लेखक - पु.ल. देशपांडे*

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही,
न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती
जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा
नवा शिपाई'
मला साने गुरूजींमध्ये दिसला.
साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी
नाही तरी गोष्टी बोलू नये

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते.
गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले.
आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो..."

पु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं.
"शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा,
स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार,
खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा,
त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा,
दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाड
ं खुली करायला सांगणारा
हा महामानव या पवित्रभूमीत
राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला."
ज्या वेळेला गोविंदा पेटी वाजवतो, त्या वेळी आपण म्हणतो, “अरे, शब्दन्शब्द ऐकू येत होता!” महाराष्ट्राला साथीमध्ये अशी शब्दन्शब्द ऐकायची सुंदर सवय नाटकांनी इतकी लावलेली आहे की, तशी पेटी न वाजवणारे लोक हे बाजा वाजवतात; आणि म्हणून ज्यांनी ती पेटी ऐकली नाही असे मूर्ख लोक रेडिओवर पेटी बंद करतात! कारण त्यांनी चांगली पेटी कधी ऐकलीच नाही त्यांनी बाजेच ऐकले त्याला ते तरी काय करणार? - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी
माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे